विजय वाडू आदिवासी पाडा ते अंतरराष्ट्रीय ख्यातीचा वारली चित्रकार
आदिवासी म्हटले की मागास,अशिक्षीत, बुजरा अशी बिरूद आपोआप लावली जातात ,परंतु काळ बदलला आहे आज आदिवासी तरूण कोणत्याही बाबतीत मागे राहिलेला नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडतो आहे आणि बर्याच प्रमाणात यशस्वी होतो आहे. आज आपण अशाच एका आदिवासी युवकाची यशोगाथा या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.एका सामान्य आदिवासी कुटूंबात जन्माला आलेला हा युवक आज आपल्या कुटूंबाचेच नव्हे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावत आहे.
विजय बाबू वाडू या पंचवीशीतील युवकाचा जन्म गंजाड ता.डहाणू जि.पालघर येथील गरीब आदिवासी कुटूंबात झाला इतर आदिवासी प्रमाणे विजयचे आई वडील ही शेती मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत. विजयचे दहावी पर्यंत चे शिक्षण आदिवासी आश्रम शाळा अंबेसरी येथे झाले. पुढे घरच्या हलाकीच्या परीस्थितीमुळे तो दोन वर्षे शिक्षण घेऊ शकला नाही. दरम्यान तो लग्ण कार्यात चौक काढून देण्याचे काम करत असे यातून त्याला जी काही थोडीफार रक्कम मिळत असे त्यातून तो वारली चित्र कलेसाठी जे साहित्य लागत असे ते तो खरेदी करू लागला तसेच विजयचे काका प्रकाश वाडू हे वारली चित्रकार म्हणून नावाजलेले व्यक्ती त्यांच्याकडूनच तो ही कला अधिक बारकाईने शिकू लागला, विजयचे सुदैव गंजाड हे गाव प्रसिद्ध पद्मश्री वारली चित्रकार जिवा सोम्या मसे हे याच गावचे सुपुत्र. एका अर्थाने त्यांचाच वारसा आज विजय आणि त्याचे काका यशस्वी पणे चालवताना दिसत आहेत.
२०१२ मध्ये मात्र त्याने अकरावी ला तलासरे येथील परूळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आपले पुढील शिक्षण सुरू ठेवले. विजयला लहानपणी पासूनच वारली चित्रकलेची आवड होती पन खर्या अर्थाने या क्षेत्रात काकांच्या मार्गदर्शनाने पुर्णपणे उतरला, आणि त्याचा हा प्रवास प्रकाश काकांच्या मार्गदर्शन आणि सोबतीने सुरू झाला . प्रकाश काकांनी विजयच्या कलेची माहिती आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन संस्थेला करून दिली . याचा फायदा असा असा झाला २०१४ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला संशोधन केंद्र आयोजित राष्ट्रीय कला महोत्सवात विजय प्रथमच सहा दिवसीय कार्यशाळेस हजर राहू शकला.पुढे नोव्हेंबर २०१६ आदिवासी संशोधन संस्थे मार्फत ओरीसा भुवनेश्वर येथील प्रदर्शनात विजयाच्या चिंत्राचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्राबाहेर भरलेले हे पहिलेच प्रदर्शन होते यानंतर मात्र विजयने मागे बघून पाहिले नाही, यानंतर दिल्ली ,मुंबई, पुणे आणि सुरजकुंड याठिकाणी विजयच्या चित्रांचे प्रदर्शन भरले आणि यात त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. सुरजकुंड राजस्थान येथे भरलेल्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी आलेले कलाकार संपूर्ण जगातुन आलेले होते त्यात तेहतिस आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये विजयचा समावेश होता आणि वारली चित्रकार म्हणून विजय एकमेव कलाकार होता.
२०१८ मध्ये विजयचे काका प्रकाश
मधुकर वाडूंमुळे विजयचा परीचय डहाणू येथील कला प्रेमी फिरोजा ताप्ती यांच्याशी झाला. फिरोजा या INTAC( Indian Natinal trust & Cultural Heritage) या संस्थेशी संलग्न असल्याने त्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय कलाकार ,पर्यटक व कलाप्रेमीशी येऊ लागला आणि त्याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली .परीणामी विदेशी कलाप्रेमी पर्यटक विजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेऊन त्याची चित्र विकत घेऊ लागली यातून विजयला चांगले आर्थिक उत्पन्न होऊ लागले आणि त्याची ओळख अता भारता बाहेर होऊ लागली या प्रवासात प्रत्येक वेळी विजयचे काका त्याच्या सोबत होते हे उल्लेखनीय आहे.विजयची ख्याती सर्व दूर पसरली त्यामुळे त्याला राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या राज्यातून प्रदर्शन व कार्यशाळेचे आमंत्रण येऊ लागले .यातून विजयने अनेक स्वनिर्मित संकल्पनांचा विकास करून वारली चित्रकलेला एका अर्थाने हातभारच लावला. आजही विजयला ललीत कला अकादमी सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कार्यशाळेसाठी आमंत्रणे येतात.
विजय साठी आणि त्याच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे अलीकडेच ऑस्ट्रेलियात दार्जिलिंग आणि माया इंडियन गॅलरीत विजयच्या ८२ चित्रांचा समावेश होता . याप्रदर्शनामुळे विजयच्या जीवनाला एक मोठी कलाटणी मिळाली असे त्याचे मत आहे कारण यामुळे त्याची चित्रांना आता जर्मनी ,फ्रान्स, इंग्लंड ,पोर्तुगाल व जपान या देशांतून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे आणि यातून त्याची व त्याच्या परीवाराची आर्थिक परिस्थिती उत्तम होत आहे .
सध्या विजय वाडू यशवंतरावं चव्हाण मुक्त विद्यापीठात कला शाखेच्या अंतीम वर्षात शिकतो आहे .
हा लेख आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते विजय ही एका सामान्य आदिवासी गरीब कुटूंबात जन्माला येऊन आश्रम शाळेत शिक्षण घेऊन आज राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव झळकावतो आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता पन जिद्द आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कोणीही यशस्वी होऊ शकतो . विजयला पुढील वाटचालीसाठी अस्मिता मासिक व आदिवासी विकास विभागाकडून हार्दिक शुभेच्छा.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा